TEXT 51
arjuna uvāca
dṛṣṭvedaṁ mānuṣaṁ rūpaṁ
tava saumyaṁ janārdana
idānīm asmi saṁvṛttaḥ
sa-cetāḥ prakṛtiṁ gataḥ
अर्जुनः उवाच-अर्जुन म्हणाला; दृष्ट्रा-पाहून; इदम्-हे; मानुषम्-मानव; रूपम्-रूप; तव-तुमचे; सौम्यम्-अत्यंत सुंदर; जनार्दन-हे जनार्दन; इदानीम्-आता; अस्मि-मी आहे; संवृत्तः-स्थिर; स-चेताः-माझ्या भावनेमध्ये, चित्तामध्ये; प्रकृतिम्-स्वत:च्या स्वभावामध्ये; गत:-पुन्हा आले आहे.
अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपामध्ये पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अतीव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे.
तात्पर्य: या श्लोकातील मानुषम् रूपम् शब्द स्पष्टपणे दर्शवितात की, भगवान हे मूलत: द्विभुजधारी आहेत. श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून जे उपहास करतात त्यांना या ठिकाणी, श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शविण्यात आले आहे. श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असते तर त्यांना विश्वरूप दाखविणे आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखविणे कसे शक्य झाले असते? म्हणून भगवद्गीतेमध्ये निक्षून सांगण्यात आले आहे की, जो श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो आणि श्रीकृष्णांच्या माध्यमातून निर्विशेष ब्रह्मच बोलत असल्याचा दावा करून वाचकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे तो मोठा अन्यायच करीत आहे. वस्तुतः श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप आणि चतुर्भुज विष्णुरूप दाखविले आहे, तर मग ते साधारण मानव कसे असू शकतात? भगवद्गीतेवरील अशा दिशाभूल करणा-या भाष्यांमुळे शुद्ध भक्त गोंधळून जात नाही, कारण त्याला यथार्थ तत्व माहीत असते. भगवद्गीतेचे मूळ श्लोक सूर्याप्रमाणेच स्पष्ट आहेत, त्यांना मूख भाष्यकारांकडून दिव्याच्या प्रकाशाची मुळीच आवश्यकता नाही.