No edit permissions for मराठी

TEXT 13

sarva-karmāṇi manasā
sannyasyāste sukhaṁ vaśī
nava-dvāre pure dehī
naiva kurvan na kārayan

सर्व-सर्व; कर्माणि-कर्मे; मनसा-मनाद्वारे; सन्न्यस्य-त्याग करून; आस्ते-राहतो; सुखम्-सुखाने; वशी-संयमित; नव-द्वारे-नऊ दारे असलेल्या; पुरे-नगरामध्ये; देही-देहधारी आत्मा; -कधीच नाही; एव-निश्चितच्; कृर्वन्-करतो; -नाही; कारयन्-करवितो.

जेव्हा देहधारी जीव आपली  प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्मन करविता, नऊ द्वारे असलेल्या या नगरात (भौतिक शरीर) सुखाने राहतो.

तात्पर्य: देहधारी जीव हा नऊ द्वारे असलेल्या नगरात राहतो.देहाची किंवा देहरुपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीरावस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दु:ख भोगतो. कृष्णभावनेद्वारे तो आपले मूळ स्वरुप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्णभावनेचा अंगीकार करतो तेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो नऊ द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. ही नऊ द्वारे पुढीलप्रमाणे आहेत.

नवद्वारे पूरे देही हंसो लेलायते बहि:।
वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च॥

     ‘‘जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे ब्रह्मांडातील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत. शरीराला नऊ द्वारे असतात. (दोन नेत्र, दोन नाकपुड्या, दोन कान, एक मुख, एक गुद आणि एक उपस्थ) जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो.  परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंतांशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असनूही भगवंतांप्रमाणेच मुक्त असतो.’’ (श्‍वेताश्‍वतर उपनिषद् 3.18)

म्हणून कृष्णभावनाभावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो.

« Previous Next »